सावट

 


गरम गरम कॉफी चा घोट घेत स्वरूपाने खिडकीतून बाहेर पहिले. धुक्याचा पापुद्रा कापत २-४ सूर्यकिरण समुद्राच्या पाण्यात डुबकी मारू पाहात होते.. वाऱ्याच्या तालावर नाचत काही लाटा आजही किनाऱ्याकडे येतच होत्या. त्यात आता कालच्या भरतीचा जोर नव्हता, पण आपल्या जन्माचे तेच एक लक्ष्य असल्यासारखी त्यांची ये-जा सुरु होती. तिकडे दूर क्षितिजापाशी समुद्र शांत झालेला, थांबलेला वाटला तरी त्याच्या उरात अविरत चाललेली खळबळ स्वरूपाला जाणवत होती. 


कुठल्यातरी डोंगर माथ्यावर एक पाण्याचा स्रोत उगम पावतो आणि मग त्याची धडपड सुरु होते प्रवाही झरा बनून, नदीत मिसळण्यासाठी, नदीचा आटापिटा असतो समुद्राला मिळण्यासाठी. झरा नदीत मिळून किंवा नदी समुद्रात मिळून शांत होते का? आणि हे शांत होणे तरी काय असते? अशी शांतता, स्तब्धता क्षणिक असते की राहते चीरकाल? तिला एकदम काल बीच वर चालताना फोन च्या कॅमेऱ्यात टिपलेल्या फोटो ची आठवण झाली.. पलीकडे उधाणलेला समुद्र, किनाऱ्यावरील खडकांवर येऊन आदळणाऱ्या लाटा आणि त्याच लाटांचे खडकांच्या एका बेचक्यात येऊन अडकलेले, एकही तरंग न उठणारे, शांत-निश्चल पाणी! आपल्याला मनाची अशी "शांत, तरंग विरहित" अवस्था कधी तरी झालीय का या बाबत स्वरूपाचे मन साशंकच होते. तिच्या आजपर्यंतच्या आयुष्याचा जो अनुभव होता, त्यात कायमच जी खळबळ होती, त्याचे तरंग आजही तिच्या मनावर उमटायचे. म्हणजे आता वय वर्ष ४५ होऊनही ती अजूनही "एकटी" होती, पण केयूर च्या मुलाची "रूपाज्जी" झालेली होती. लौकिकार्थाने ती कुटुंबाला, समाजाला स्थिरावल्यासारखी वाटत असली तरी तिचे, स्वरूपाचे स्वतःचे असे जे अंतर्मन होते, ते काहीसे अस्थिर होते. खरं तर त्या अस्थिरतेची झिंग आवडत होतीच तिच्या मनाला, पण गेली काही वर्ष वाटायला लागले होते की बास करावे आता हे धावणे, वर्षानुवर्ष परिस्थितीशी झुंजणे आणि या कारणांची कुबडी घेऊन वेगळ्याच मार्गाने स्वतःसाठी आनंद शोधणे. अर्थात जेव्हापासून तिने स्वतः कॅलेंडर डिझाईन ची कामे घ्यायला सुरुवात केली, एक्झिबिशन्स भरवू लागली, आणि फोटो-शूट करत वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी फिरू लागली तेंव्हा त्या निसर्गाच्या विविध रूपात तिला आयुष्याचे खरे रंग सापडू लागले, जगण्यातले नवे अर्थ उमजू लागले आणि आपसूकच क्षणिक झिंग देणारी "फुलपाखरे" मनात रुंजी घालेनाशी झाली.  


अचानक खांद्यावर झालेल्या स्पर्शाने ती आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडत असतानाच तिच्या कपाळावर ओठ ठेवत त्याने विचारले, ' काय गं मुली, आज अजून निवांत? जायचं नाहीये वाटतं फोटोग्राफी च्या नावाखाली भटकंती करायला?" 


जायचंय की रे रोमी. तू उठण्याचीच वाट बघत होते. काल रात्री खूप वेळ रंगवत बसला होतास वाटतं. 


हो गं, काल जरा जमून आल्यासारखं वाटलं खरं! रुप्स तुझं, स्वरूपा दाते चं आयुष्यचित्र रेखाटायचं आणि त्यात, तुझ्या जीवन प्रवासाला न्याय देणारे रंग भरायचे -  it's not an easy job... पण तुझ्या गोड चेहऱ्यावरील ओथंबलेल्या डोळ्यांत जे वाचायला मिळतं, आणि मग जे थोडेफार समजतं त्यातून एवढी ऊर्जा मिळते ना की नाही थांबवता येत स्वतःला. त्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांमधून मग उतरवत रहातो मी तुझे एक न संपणारे आकाश ज्यावर असते असंख्य शक्यतांची उमटणारी नक्षी, एक अथांग समुद्र ज्यात कितीही खोल उतरले तरी हाताला न लागणारा तळ, एक सूर्योदय उद्याची सोनेरी हाक देणारा, एक केशरी सूर्यास्त आजची भ्रांत संपवणारा, एक हिरवीकंच वनराई सृजनाच्या वाटेचा प्रवास घडवणारी, आणि.. आणि अस बरंच  काही!


अरे हो हो रोमी, वेडा आहेस खरंच तू. 


ओके ! आहेच मी वेडा. बर चल, मी निघतो. मला काही गोष्टी आणायच्या आहेत गावातून. संध्याकाळपर्यंत येईन असं म्हणत हे रोमी नावाचं स्वरूपाच्या आयुष्यातील "सध्याचं" फुलपाखरू आपल्या रॉयल एन्फिल्ड ला किक मारून "फडफडत' निघून गेलं आणि त्याच्या उडालेल्या धुरळ्यात स्वरूपाला आपला भूतकाळ दिसू लागला. 


सातवीत होते मी तेंव्हा. बाबा बँकेत चांगले मॅनेजर, आई गृहिणी परंतु अनेक कलागुणसंपन्न, त्यामुळे तिचे काही ना काही छोटे प्रोजेक्ट्स सुरु असत. म्हणजे कधी कोणाचे स्वेटर्स विणून दे तर कधी रुखवताचे वेगवेगळे प्रकार बनव. कधी कोणाला पुरणपोळ्या बनवून दे तर कधी माझ्यासाठी वेगवेगळ्या फॅशन चे ड्रेसच शिव. आमच्याकडे नातेवाईकांचे येणे-जाणे पण खूप असायचे तेंव्हा. मी एकुलती एक म्हणून लाड खूप व्हायचे माझे. असे सगळे छान सुरु असताना अचानक आई ला बरे वाटेनासे झाले. त्या दिवशी बँकेतून बाबा आले ते आईला हाक मारतच. मी अभ्यास करत बसले होते बाहेरच्या खोलीत. मला म्हणाले रूपा, आई कुठाय ग? मी सांगितले आत आराम करतेय. आज दुपारी पण तिला खूप उलट्या झाल्या म्हणाली. मी शाळेतून आल्यास पडूनच आहे ती बेडरूम मध्ये, पण त्यामुळे जास्त काळजी न वाटता उलट बाबा जास्त खुश दिसू लागले. २-३ महिन्यांनी आईला भेटायला मामी घरी आली असताना मला म्हणाली "समजले का काही स्वरूपा तुला? ताई होणार तू आता", आणि ते ऐकताच आनंद होण्या-ऐवजी मला शरमच जास्त आली होती हे तेवढ्याच ठळकपणे आजही आठवतेय. मला तोवर खूप काही कळत होत अस नाही, पण १३-१४ वर्षाच्या मुलीची जी काही मानसिकता असते त्यामुळे मला एकूणच सगळा प्रकार "विचित्र" वाटून आणि त्यावर कसे व्यक्त व्हावे हे न समजल्याने मी तेंव्हापासून अबोल आणि अंतर्मुख होत गेले. आई-बाबांचे माझ्यावरचे लक्ष कमी होऊन आता येणाऱ्या बाळाविषयी जास्त बोलणे होऊ लागले. आज्जी (आईची आई) आमच्याकडे येऊन राहिली आणि ती आता मला माझी जबाबदारी कशी वाढणार, आई बाळामध्ये व्यस्त राहणार त्यामुळे माझा अभ्यास सांभळून घरातील कामात मला तिला कशी मदत करावी लागणार वगैरे वगैरे सांगू लागली आणि भाज्या चिरणे, कणिक मळणे, कपडे वाळत घालणे अशी कामे देऊ लागली. आत्तापर्यंत जी आजी घरी आली की माझे खूप खूप लाड करी, मला छान शिक, मोठी हो असे सांगी, तीच आज्जी आता अचानक असे का करत होती? मला सगळ्यांचाच राग येऊ लागला होता. शाळेत मैत्रिणींवर तो राग निघून त्यांच्याशी भांडणं होऊ लागली होती आणि अभ्यासातील लक्ष हळू हळू उडू लागले होते. अर्थात आई-बाबांना त्याचे काही गम्य नव्हते असे वाटाण्याएवढे ते नव्या बाळाच्या आगमनाच्या तयारीत बुडून गेले होते... आणि केयूर चा जन्म झाला. आईनेच नाव ठरवून ठेवले होते. मुलगाच होणार हे जणू तिला आधीच समजले होते. अर्थातच मुलगा झाल्याचे समजल्यावर आज्जीच्या आणि बाबांच्या आनंदाला पारावार नाही राहिला. खरं तर मी जेंव्हा बाबांबरोबर हॉस्पिटल ला गेले तेंव्हा मी कशी त्या प्रसंगाला तोंड देणार हे माझ मलाच माहित नव्हत, पण केयूर चा लाल-गोरा चेहरा, छोटुकले गुलाबी ओठ, चेहऱ्यावर पसरलेली कोवळी लव, बंद मुठीची हालचाल हे सगळं पाहून माझा गेल्या ६-७ महिन्याचा त्रागा कुठल्या कुठे पळून गेला. आई मात्र खूपच दमलेली दिसत होती, तिचे डोळे एकदम खोल गेले होते..पण ओठांवर हसू मात्र होत. त्या क्षणापासून मी खरंच एकदम समंजस "ताई" होऊन गेले. 


आई आठवडयांनी घरी आली, पण तिची तब्येत अजूनच खराब होत गेली. आज्जी बाळाचे करण्यात आणि मी शाळेचा अभ्यास सांभाळून घरातील कामे करण्यात व्यस्त होऊन गेलो. बाबा बँक सांभाळून आईचे औषध-पाणी, डॉक्टर च्या खेपा यात बुडून गेले. आईची तब्येत काही सुधरेना. वाढलेल्या वयामुळे हे बाळंतपण तिला झेपणार नाही असे आधीच डॉक्टर काकांनी सांगितल्याचे आज्जी शेजारच्या मावशींना सांगताना मी ऐकले होते. आणि नक्की काय होतय हे कळायच्या आतच एक दिवस आई आम्हाला, या जगालाच सोडून गेली. आमच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मी आताशा एका भोवऱ्यातून बाहेर पडून स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतानाच परिस्थितीने मला पुन्हा एका अशा गर्तेत फेकून दिले होते की त्यातून बाहेर पडायला मार्ग शोधण्यात माझी शक्ती खरंच कमी पडत होती. 


बाबांना हा धक्का काही सहन झाला नाही आणि ते दारू पिऊन रात्र रात्र बाहेर राहू लागले. घरी आज्जी, मी आणि केयूर. पुढच्या दोन महिन्यात हा सगळाच ताण आज्जीला सहन होईना आणि माझे वाढते वय लक्षात घेऊन तिने केयूर ला आणि मला घेऊन मामाकडे गावी जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर शाळेची महत्वाची वर्ष माझ्यापुढे होती, पण बाबांचे एकंदर वागणे बघून आज्जीपुढे दुसरा काही पर्याय राहिला नव्हता. एव्हाना एका पाठोपाठ आलेल्या संकंटांना तोंड देता देता मी पण वयाच्या मानाने एकदम मोठी होऊन गेले होते आणि गावातील नवीन घरात, नवीन शाळेत स्वतःला बघण्याची सवय करता करता एकीकडे माझ्या मनाने "दगड" बनायची प्रक्रिया सुरु केली होती. 


स्वरूपाचा श्वास एकदम जड झाला हे सगळे आठवताना.. आयुष्य अर्ध्यावर आले होते आता. या सगळ्याच्या खूप पुढे निघून आलोय असे वाटायचे  - पण आज अचानक स्वरूपाला तिचा भूतकाळ मागे खेचून नेत होता आणि ती तिच्याही नकळत त्यात ओढली जात होती.. 


मामा-मामी तसे स्वभावाने चांगलेच होते, आणि आज्जी आधीही त्यांच्याबरोबरच राहात होती, पण ते त्यांची दोन मुलं आणि आता त्यात माझी आणि केयूर ची भर पडल्याने नाही म्हंटले तरी त्यांची ओढाताण व्हायला लागली होती. बाबा कधीतरी येत, थोडे पैसे देत पण आपण आता दारू पिणे सोडलय आणि मुलांना घेऊन जातो असे कधी ते म्हणतील याची मी वाट पाही, पण ते कधी झालेच नाही. मला तळहातावरच्या फोडासारखे जपणारे आई-बाबा, त्यांचा इतक्या वर्षांचा संसार हे सगळे असे एका क्षणात विरून कसे गेले आणि का गेले हे मला कितीही विचार केला तरी समजत नसे. माणूस एखाद्या घटनेने एवढा कोलमडून कसा जातो? जो मनाचा खंबीरपणा बाबांनी दाखवणे गरजेचे होते तो त्यांनी न दाखवल्यामुळे आज वयाच्या १५ व्य वर्षी मला कित्येक अवघड गोष्टींचा सामना करावा लागत होता हे त्यांना कळत का नव्हते? आज्जी अलीकडे बघावं तेंव्हा आसवं ढाळायची आणि कोणाची दृष्ट लागली माझ्या पोरीच्या सुखी संसाराला, माझ्या गुणी-देखण्या नातीच्या आयुष्याचं हे काय झालं म्हणत अजूनच उपास-तापास करायची. 


केयूर चे त्या मानाने बरे होते. सगळ्यात लहान म्हणून त्याचे लाड होत, चांगली काळजी घेतली जाई. कधी कधी मामा-मामीच्या मुलांबरोबर तो हि त्यांना आई-बाबा म्हणू लागे पण मामीला ते फारसे आवडत नसावे, कारण आधी प्रेमाने सांगून आणि मग रागावून तिने केयूर ची ती सवय मोडली आणि आपसूकच केयूर च्या पालकत्वाची जबाबदारी प्रसंगानुरूप माझ्यावर येऊन पडली. या सगळ्या प्रकारात माझा दहावीचा अभ्यास काही फारसा चांगला झाला नाही पण मामाचा ताण कमी करण्यासाठी आणि केयूर च्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी मी जेवढ्या लवकर  पैसे मिळवायला सुरुवात करेन तेवढे चांगले याची जाणीव मात्र झाली. माझ्या एका मैत्रिणीने त्याच सुमारास टायपिंग शिकायचा क्लास लावला आणि मग मी पण त्याच क्लास ला माझे नाव नोंदवले. त्याचे पैसे अर्थातच मामाला द्यावे लागले पण हे शिकून पोरगी कदाचित कुठल्याशा ऑफिसात काम करून मला हातभार लावेल ही आशा त्याला असावी. माझ्याकडे पण बाकी काही पर्याय नसल्याने मी मन लावून टायपिंग शिकायला लागले. 


याच सुमारास माझ्या आयुष्यात "सुमित" नावाचे एक तरुण फुलपाखरू उडत आले. त्याचे झाले असे की, माझ्या  टायपिंग क्लास च्या आतली एक छोटी खोली मालकाने एका फोटोग्राफर ला भाड्याने दिली होती आणि सुमित तिथे काम करायचा. आमच्या मालकांच्या पण टायपिंग ऑर्डर्स डिलिव्हर करण्याचे काम तो अधून मधून करायचा. एव्हाना माझ्याकडे बघण्याची मुलांची बदललेली नजर समजण्याइतकी समज मला नक्कीच आली होती त्यामुळे माझ्या क्लास च्या वेळेला सुमित चे तिथे घुटमळणे, मधेच मला पाणी हवे का विचारणे, तत्परतेने माझ्या टायपिंग मशीन शेजारी कागद आणून ठेवणे, याची नोंद माझे सतर्क मन घेत होते आणि या सगळ्याची मनातून जरी थोडी भीती वाटत होती, तरी आज ३-४ वर्षांनी कोणीतरी मला एवढे "अटेन्शन" देत होते, मला हवं - नको बघत होते या विचारानेच मी सुखावून जात होते. 


आत्ता या क्षणी सुद्धा सुमित च्या आठवणीने स्वरूपाच्या ओठांवर नकळत हसू खुलले. आजचा दिवसच वेगळा होता. स्वरूपा एव्हाना बीच वर असायला हवी होती. दोनच दिवस होते तिच्या हातात सध्याची असाइनमेंट पूर्ण करायला. पण आपल्या भूतकाळाच्या स्मृतींमध्ये ती मात्र पूर्णपणे हरवून खुर्चीला खिळून गेली होती. एव्हाना १ वाजून गेला होता, पण तिला जेवणा-खाण्याचे भान नव्हते. 


ते वयच तसे होते. सुमित खर तर दिसायला एकदमच सर्वसाधारण होता. घरची परिस्थिती पण बेताचीच होती. पण माझ्या दगड होत चाललेल्या मनावर अलगद फुंकर घालण्याचे काम तो करत होता, माझ्या मनाच्या कोऱ्या कागदावर आपल्या तारुण्याचे फुलपाखरी रंग तो उडवायला लागला होता - मला तर तो माझ्या वाळवंटासारख्या आयुष्यातील "ओऍसिस" वाटू लागला होता. एखाद्या दिवशी माझ्या क्लास च्या वेळी तो तिथे नसेल तर चुकल्यासारखे वाटायचे. या सगळ्या वाटण्याचा नक्की अर्थ काय, त्याचे पुढील परिणाम काय असे विचार कधीतरी मनात डोकावत, पण त्या "भावनेत" एवढी ओढ होती, त्यात एवढी जादू होती, की मी आपसूकच त्या खेळात गुंतत गेले. 


झालं, १० वी चा निकाल लागला. एरवी ८०-८५ टक्के मिळवू शकणारी आणि डॉक्टर, इंजिनीअर होण्याचे स्वप्न बघणारी मी जेमतेम पास झाले. गावात अकरावी-बारावी पर्यंत शिक्षण होते, त्यानंतर मात्र शहरातील कॉलेज ला जाऊन डिग्री घ्यावी लागली असती. अर्थात तेंव्हा एवढ्या पुढचा विचार करणे शक्य नव्हते. मी गावातच ११ वी कला शाखेला ऍडमिशन घेतली. 


आज्जीची तब्येत आता खालावत चालली होती. आईच्या जाण्यानंतर तिच्या डोळ्याचे पाणी कधी थांबलेच नाही. मी मामीला घरात शक्य तेवढी मदत करून, केयूर चे सगळे आवरणे करून, आज्जीचे औषध, पाणी करून मग कॉलेज ला जात असे. मामेभावंडं पण आता मोठी होत होती. त्यांचे वेगवेगळे क्लास, त्याचे खर्च, पुढील शिक्षणाची सोय यात मामाची ओढाताण होतच होती. पण या व्यतिरिक्त मामा-मामीने माझे आणि केयूर चे सगळे मनापासून, मायेने केले. दुःखात सुख म्हणावे ते एवढेच. हे सगळे चालू असताना एक विशेष घडले ते म्हणजे सुमित च्या नादाने मला फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली आणि टायपिंग क्लास मध्ये पुढचा एक एक टप्पा गाठता गाठता जो काही वेळ मी त्याच्याबरोबर घालवत असे त्यात मग मी वेगवगेळ्या लेन्सेस, त्याची टेक्निक्स, फोटो प्रिंटिंग, प्रोसेसिग असे सगळे शिकत गेले. माझी त्यातील आवड लक्षात घेऊन मग स्टुडिओ च्या मालकांनी मला छोटे-मोठे काम द्यायला सुरुवात केली आणि मी खऱ्या अर्थाने "मिळवती" झाले. तेंव्हाच माझ्या अजूनही एक लक्षात आले ते म्हणजे सुमित नावाच्या माझ्या आयुष्यातील फुलपाखराचे रंग मला फिकटल्यासारखे वाटू लागले. एखादा ओझरता स्पर्श आणि निसटते चुंबन यापलीकडे कधी काही घडलेच नाही. शहरात वाढल्याने माझे वाचन खूप होते. नाटक, गाणी, सिनेमा याची आवड आणि माहिती होती. पण सुमितला स्टुडिओ मधील कामाव्यतिरिक्त बाकी कुठल्याही गोष्टीत विशेष गंध नव्हता आणि तो खूप अबोल ही होता. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा हे काही त्याच्याबरोबर होत नसे. त्यामुळेच असेल कदाचित पण कालांतराने त्याच्या विषयी मला वाटणारी ओढ़ कमी होऊ लागली. नवीन फुलपाखरू, नवीन रंग टिपण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली. 


कॉलेज मधले वातावरण मोकळे होते. अनेक मुलं माझ्यात "रस" घेऊ बघत होती आणि मलाही काही मुलांविषयी नकळत आकर्षण वाटू लागले होते. पण मुला-मुलींची "खास" मैत्री, कट्ट्यावरचा टाईमपास यात मात्र मला सहभागी होता येत नसे. घराची कामे, केयूर चे संगोपन, टायपिंग क्लास, फोटो स्टुडिओ हि सगळी तारेवरची कसरत सांभाळताना कॉलेज च्या त्या वातावरणाचा पुरेपूर आनंद घ्यायला मला जमत नव्हते, पण सध्या माझी तशी काही तक्रार नव्हती. थोडे स्थिरावल्यासारखे वाटत होते. आत्मभान येत होते आणि त्यात एकंदर मी खुश होते. आपण शेवटी परिस्थितीवर मात केली याचा एक सुप्त आनंद सुद्धा होताच. 


हा आनंद फार काळ टिकला मात्र नाही. बाबांच्या बँकेमधून एक तार आली. त्यात त्यांनी मामाला "अर्जंट" या मथळ्याखाली बोलावून घेतले. चार दिवसांनी मामा परत आला तो "बाबा गेले" या बातमीसह. घर उदासलं, पण कोणाच्याच डोळ्याला पाणी आलं नाही. माझ्याही नाही. आईचे काही दागिने आणि बाबांची थोडीफार शिल्लक मी १८ ची झाल्यावर मला मिळणार होते, पण त्याचे फार काही सोयरसुतक मला वाटले नाही. काही दिवसातच आज्जी पण गेली आणि मी खऱ्या अर्थाने "पोरकी" झाले. खरं तर आई गेली तेंव्हाच तसे वाटायला हवे होते, पण आज्जीने ते पोरकेपण काही जाणवू दिले नाही. कधी कधी विचार केला तर आमचे आयुष्य म्हणजे एखाद्या नाटक-सिनेमाची कथा वाटायचे मला. अशा गोष्टी तिथेच बघितलेल्या आणि कथा-कादंबऱ्यांतून वाचलेल्या. अशा वेळी हसावे की रडावे कळायचे नाही. बालपणातील आई-बाबां बरोबर घालवलेले क्षण म्हणजे केवळ एक स्वप्न वाटाण्याएवढी उलथापालथ झाली होती पुढच्या सगळ्या आयुष्यात. 


स्वरूपाने एक सुस्कारा सोडला - आणि तिचे मन पुन्हा त्या आठवणीकडे वळले. 


केयूरची पण आता शाळा सुरु झाली होती आणि त्याची फी, बाकी खर्च याची जबाबदारी मी आपसूकच माझ्यावर घेतली. मामा-मामीने जरा टोकले, पण मनातून ते सुखावल्याचे जाणवले, आणि त्यात गैर काही नाही हे कळण्याएवढी समज मला आलेली होती. माझ्या आणि केयूर च्या डोक्यावर छप्पर त्यांनी देऊ केलं, एक कुटुंबाचं सुरक्षा कवच दिलं - त्याच्याहून अधिक मलाही त्यांच्याकडून काही नको होतं. माझी बारावी अशीच जेमतेम झाली - पण दरम्यान आता टायपिंग क्लास पण मी मॅनेज करायला लागले होते. क्लास च्या ओनर ला त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी काही महिने शहरात जाऊन राहावे लागणार होते. मी विश्वासातलीच होते, मामा-मामी आणि त्यांच्या कुटुंबाची अनेक वर्षांची ओळख होती. हातात पैसे मिळू लागल्यावर मलाही त्या स्वातंत्र्याची सवय लागली. आणि घरच्या कुठल्याच जबाबदाऱ्यांतून लवकर सुटण्याची काही चिन्ह दिसत नसल्याने मी पुढील शिक्षणाचा विचार सोडून माझा पूर्ण वेळ टायपिंग क्लास व फोटो स्टुडिओ मॅनेज करणे यात घालवू लागले. गोड़ बोलणे, एव्हाना अंगात मुरलेला व्यवहार-चटपटीतपणा आणि वयाच्या मानाने लवकर आलेली समज याच्या बळावर दोन्ही व्यवसाय मी लीलया सांभाळू लागले. मिळकत वाढली आणि "सावरले पोरीने एवढ्या लहान वयात अक्ख्या कुटुंबाला" असे शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे कौतुकाचे उद्गार पण कानावर येऊ लागले. 


फटफटीच्या आवाजाने स्वरूपाची तंद्री मोडली आणि लक्षात आले आपण अजून त्याच सकाळच्या खुर्चीत बसून आहोत काहीही न खाता-पिता. शेजारच्या टेबलावर ठेवलेला सकाळच्या कॉफी चा कप पार वाळून गेला होता. आणि हे दृश्य पाहून परत आलेला रोमी माझ्यावर प्रचंड वैतागणार असा विचार मनात येत असतानाच रोमी आत आला. मला तसे बसलेले बघून त्याच्या चेहऱ्यावर आलेली आश्चर्याची भावना लगेचच विरून त्याची जागा काळजीने घेतली. 


अगं ए मुली..बरी आहेस ना तू? अशी काय बसलीयेस? तू गेली नाहीस का तुझ्या फोटोसेशन ला? काही होतंय का? बोल ना.. आणि हे काय? कॉफी चा मग असाच पडलाय. लंच केलं नाहीस का? मी काय विचारतोय.. 


अरे हो रे. थांबशील तू तर मी बोलेन ना. मी बरी आहे, पण का कोण जाणे तू गेलास सकाळी आणि मी माझ्याही नकळत "डाउन द मेमरी लेन" गेले. काय काय सगळे आठवत राहिले आणि मग आय लॉस्ट सेन्स ऑफ टाइम. आत्ता तुझी फटफटी वाजली ना, त्याच्यामुळे माझी विचारांची साखळी तुटली. 


तुला मी एवढे "लॉस्ट" कधीच पहिले नाही रुप्स. असे काय झाले आज एवढे? म्हणजे तुला सांगायचे नसेल तर राहूदे पण सांगितल्याने कदाचित मोकळे वाटेल तुला. 


अरे तसे न सांगण्यासारखे काही नाही. जस्ट माझे लहानपण, त्यातील प्रसंग, तेंव्हाची आव्हानं आठवली. आयुष्यात "पालक" नावाच्या रोल मॉडेल्स चा अभाव असल्याने स्वतःच ठेचकाळत परिस्थितीतून मार्ग काढत राहिले - ती सगळी स्टोरी रे.. तुला माहीतच आहे. 


हो, म्हणून तर मला प्रचंड उत्सुकता आणि आदर असे दोन्ही वाटते तुझ्याबद्दल. बरं, आपण बोलूच पण आधी थोडे खाऊन घे. माझे काम लवकर झाले म्हणून लवकरच घरी यायचा विचार केला. म्हंटलं तू नसशील घरी, कालच्या पेंटिंग्जवर अजून थोडा विचार करता येईल.. झटपट टोनी बरोबर लंच घेतला तिथली सँडविचेस मला खूप आवडली म्हणून तुझ्या डिनर साठी घेऊन आलो होतो, पण आत्ताच गरम करून देतो ते खा आधी.. असं म्हणत तो किचन कडे गेला. 


रोमी हे सुद्धा ३ वर्षांपूर्वी एका एक्झिबिशन च्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आलेलं एक वेगळं रसायन. हो, माझं नवं फुलपाखरू. खरं तर माझा ४० वा वाढदिवस आणि केयूर चे लग्न एकाच वर्षी आले. १४ वर्षांचे अंतर आमच्यात. माझं लग्नाचं वय सरलं तेंव्हा कोणाला त्याची जाणीव झाली कि नाही माहित नाही, पण केयूर २५ चा झाला आणि माझ्यासकट सगळ्यांनाच त्याच्या लग्नाचे वेध लागले. मधल्या काळात मामेभावंडांची पण लग्न होऊन गेली होती. मी दिसायला छान, घरातली, बाहेरची सगळी कामे एकट्याने सांभाळणारी शिवाय कमावती म्हणून सगळ्यांना खूप कौतुक होते. शिक्षण नव्हते पण लोकांना तो माझा "कुटुंबासाठी केलेला त्याग" वगैरे वाटायचा. या सगळ्या भांडवलावर तेंव्हा माझ्या साठी पण १-२ स्थळे सांगून आली होती..  मी २२-२३ वर्षांची असेन बहुदा, पण केयूर ची अजून दहावी नव्हती झाली आणि त्याचे सगळे मीच करत असल्याने मामा-मामी आणि केयूर तिघांनी मी लग्न करून सासरी गेल्यावर त्यांचे काय होणार अशी अस्पष्ट काळजी व्यक्त केली. काय घाई आहे, केयूर चे १०वी-१२वी झाले की बघू असा विचार मी पण केला.. आणि खरं तर माझी "फुलपाखरू आणि ओऍसिस" ही गुंतवणूक तोपर्यंत बरीच वाढली होती, या संकल्पनेच्या मी चक्क प्रेमातच पडले होते. परिस्थिती आणि नियतीने माझ्यापुढे उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देताना स्वतःच्या मनाला आनंद देणारी ही एकमेव गोष्ट आहे की जिच्यावर माझे पूर्ण नियंत्रण आहे अशीही मला खात्री होत होती. एक शस्त्रच बनत चालले होते ते माझे - माझ्या मनातील सुप्त अहंकाराला खतपाणी घालणारे. सुमित नंतर कॉलेज, टायपिंग क्लास, फोटो स्टुडिओ चे कस्टमर्स इथून गौरव, रमेश, नितीन, अली, आनंद, गिरीश, विनय.. अशी कित्ती फुलपाखरं मी माझ्या तळहातावर खेळविली - ऑन माय टर्म्स. आणि इथूनच ती "झिंग" माझ्यात भिनत गेली आणि त्या नादात मी वयाची "तिशी" कधी गाठली हे सुद्धा मला समजले नाही. माझे व्यवसायाच्या निमित्ताने पुरुष मंडळींशीच जास्त बोलणे होई, भेटी-गाठी होत त्यामुळे या माझ्या "फुलपाखरां" बरोबर जाणारा वेळ त्याच भूमिकेतून असणार अशी बहुदा घरच्यांनी समजूत करून घेतली होती किंवा माझ्यावरच घराची सगळी भिस्त असल्याने त्या बाबतीत मला कोणी टोकले नव्हते. या सगळ्या मित्रांना माझ्या जबाबदाऱ्यांची चांगलीच कल्पना असल्याने त्यांनीही कधी माझ्याबरोबर "लग्न करून सेटल" वगैरे होण्याची स्वप्न बघितली नसावीत. एकूण सारेच माझ्या "झिंगे" च्या पथ्यावर पडत होते. अधून मधून आपण हे काय करतोय? बाकीच्या आपल्या मैत्रिणी लग्न होऊन घर संसारात रमल्या, बाकी भावंडांची लग्न होऊन ते स्थिरावले - मग आपण ही वेगळी दिशा का पकडतोय? यात "रिस्क" किती आहे.. असे विचार मनात डोकावायचे, पण तसेच पटकन निघून पण जायचे. घरातील सगळ्यांचं सगळं करताना स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या मनाचा एक कोपरा ओला ठेवण्यासाठी मला ते आवश्यक वाटायचे - माझ्या मनाची, शरीराची तो "उन्माद" ही एक गरजच होऊन बसली होती तेंव्हा. अर्थात आयुष्याचं खरं भान आल्यावर, म्हणजे साधारण पस्तिशी नंतर ही माझी "फुलपाखरू" फिलॉसॉफी तशी मागेच पडली होती. टायपिंग क्लास वाढवून मी आता त्यात कॉम्पुटर ची पण लॅब सुरु केली होती आणि कालांतराने मी ती मालकांकडून विकत सुद्धा घेतली. फोटो स्टुडिओ पण विकत घेतला. गाव पण गेल्या काही वर्षात बरेच सुधारले होते आणि एक कर्तव्यदक्ष "उद्योजिका" म्हणून जनमानसात मला वेगळाच मान प्राप्त झाला होता. आताशा विचार करताना वाटते, परिस्थितीवर सूड उगवताना तारुण्यसुलभ भावनांचा खेळलेला खेळ हा एकच मार्ग होता का आपल्यापुढे स्वानंदासाठी, लागणारं बळ मिळवण्यासाठी? माहीत नाही, पण जे होत गेल ते अस होत एवढ मात्र खर. 


हां, घे! अगं केवढी दचकलीस? परत भूतकाळात भ्रमण करायला गेलीस की काय तेवढ्यात? म्हणत रोमीने माझ्या हातात गरम सँडविच ची प्लेट ठेवली. 


आधी मी त्याने भांड्यातून आणलेले पाणी गटागटा प्यायले आणि हसतच त्याला म्हणाले - हो, आठवणींची गाडी आता माझ्या आयुष्यातील तुझ्या एंट्री वर येऊन पोहोचलीये खरं. 


चला, म्हणजे रात्रीचे जेवण वेळच्या वेळी होईल अशी अशा करायला हरकत नाही तर!, असं म्हणत रोमी माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला. माझे सँडविच खाऊन होईपर्यंत तो ही मग खिडकीतून दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा निरखत बसला. मला पण सकाळपासून सैर-भैर झालेले मन जरा थाऱ्यावर आणायला उसंत मिळाली. 


रोमी चे हे मला खूप आवडते. तो आपल्या अवती-भवतीच्या त्याच्या अस्तित्वाचे अवडंबर कधीच होऊ देत नाही. आपल्याला हवी असणारी 'स्पेस' तो एवढ्या सहजगत्या देतो की बऱ्याचदा तो आपलाच एक भाग आहे असे वाटू लागते. 


ज्या गतीने मी ते सँडविच संपवले त्यावरून पोटात केवढी भूक लागली होती याची कल्पना कोणाही बघणाऱ्याला आली असती. शेवटचा घास गिळतानाच मी एक मोठ्ठा श्वास सोडला आणि शेजारी बसलेल्या रोमीच्या गालावर एक "थँक यु" किस देऊ केला. तो हि मग माझ्याकडे पाहून गोड़ हसला. 


तुला माहितीये का रोमी, आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे की काय वाटाण्याएवढे माझ्या दिवसाचे चक्र फिरले. मला वाटते काल मी बीच वर खडक्यांच्या बेचक्यात अडकलेले एकदम निश्चल, शांत पाणी पाहिले आणि तिथूनच बहुदा माझ्या विचारांना सुरुवात झाली. आज सकाळी कॉफी पिताना लाटांकडे बघून तेच आठवत होते. आपण निसर्गाकडून केवढे काही शिकू शकतो ना? पण आयुष्याची मार्गक्रमणा करताना, त्यातील खाच-खळग्यांना पार करताना कसे झापडे लावून करतो ना ते? संकुचित विचार आणि त्यातून काढलेले पर्याय! आज जुन्या आठवणींच्या निमित्ताने आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार केला तर जाणवते की किती मुखवटे चढवले रे मी या प्रवासात? काही नियतीने चढवले, काही कुटुंबातील लोकांच्या जबाबदाऱ्यानी आणि काही तर मी चक्क स्वेच्छेने. त्यातील माझा, या स्वरूपा चा खरा चेहरा कोणता रे? आणि तोच जर मला नाही समजला तर मग माझ्या या जीवनप्रवासाचे प्रयोजन काय? एवढी वर्ष उलटलीत पण अजूनही कधीतरी आई-बाबांविषयी डोक्यात एखाद वेळी प्रचंड रागाची तिडीक उठते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयांनी माझ्या आयुष्याचा रोख बदलून गेला. डोळ्यात सुखी आयुष्याची स्वप्न घेऊन जगणारी १२-१३ वर्षांची मुलगी होते रे मी.. पण - पण आज या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग नाही हे सुद्धा समजतंय. केयूर ची मात्र सगळी स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी मी अक्षरशः झटले. अरे त्याची बायको गरोदर राहिली ना तेंव्हा प्रथमच मला सुद्धा "आई" होण्याची तीव्र इच्छा झाली. तोपर्यंत केयूर चे सगळे संगोपन मीच केल्याने मला वाटायचे आई होणे येऊन वेगळे काय असते? पण नाही.. माझ्या , माझ्यासाठीच्या अशा अनेक इच्छांना तिलांजली देत मी केयूरच्या आनंदात सहभागी होत आलेय. त्याच्या बाळाचे जावळ जेंव्हा पहिल्यांदा हुंगले ना, तेंव्हा समजले या पृथ्वीवरचा सगळ्यात छान वास कोणता ते.. 


रोमीने एव्हाना माझा हात घट्ट पकडला होता. 


नाही रे, दुःख करत नाहीये कसलच. माझे कॉम्प्युटर चे क्लासेस मस्त चाललेत. फोटोज ची एक्झिबिशन्स तर एवढे मानसिक समाधान देतात ना! खरं तर रमलेय मी या सगळ्यात. या छायाचित्रांनी तर "काळ्या-पांढऱ्यातल्या" विविध छटा पण अचूक टिपायला शिकवले, त्याचे महत्व जाणवून दिले.  माझी "फुलपाखरू" फिलॉसॉफी ऐकून तू पण कित्ती हसला होतास आधी. तुझ्या सारख्या मित्रांच्या सहवासात मन रमवत आणि मोकळं करत राहीले. मैत्रिणी तर फारशा बनल्याचं नाहीत. आता कधीतरी उगीचच खूप एकट पडल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत आला दिवस आपला म्हणत त्यातील आव्हानांना तोंड देण्यात मन एवढे गुंतलेले असायचे की भविष्याचा  विचार डोकावायचाच नाही. आता स्वतःचा खरा शोध घेण्याची वेळ आलीये असे जाणवतेय. काल बीच वर पाहिलेल्या खडकांच्या खळग्यातल्या शांत, निश्चल पाण्यासारखे अस्तित्व व्हायला हवे आहे. ते शांत पाणीच माझ्या मनात ही विचारांची खळबळ माजवतंय. आपण जन्माला येतो तेच मृत्यूचा मुक्काम गाठण्यासाठी हे आयुष्यातील अनुभवांनी शिकवलंय. नक्की, ठाम, निर्वाणीची शांतता तिथेच मिळणार असते, हे कदाचित जन्मभर माहीत असूनही या दोन ठिबक्यांच्या मधल्या "आयुष्य" नावाच्या कल्पना विलासात असे स्थैर्याचे, शांततेचे आभासी क्षण मिळण्यासाठी धडपडत राहतो आपण. आभासी आणि क्षणिक असले तरी आता ती धडपड, तो कल्पनाविलास स्वतःसाठी करावा असे वाटतेय. मला विचार करायला हवाय.. या उर्वरित श्वासांचं पुढे नक्की काय करायचं हे ठरवायला हवंय. तू नक्की माझ्यात काय पाहतोस आणि रंगवतोस हे मला तरी कळत नाही, कारण माझा खरा चेहरा मलाही माहीत नाहीये. वरचे सगळे मुखवटे फेकून देऊन आधी त्या चेहऱ्याला बाहेर काढायला हवय रोमी.. मला त्याला शोधायला हवय... 


रोमीने त्याच्या हातात पकडलेल्या माझ्या हातावर ओठ टेकवले आणि यु शुड बी लेफ्ट अलोन फॉर सॅम टाइम - म्हणत हातातला हात काढून तिथून निघून गेला.. 


आपल्या बोटांच्या अग्रावर दोन क्षण बसून उडून गेलेल्या फुलपाखराचा गुदगुली सारखा स्पर्श नंतर कितीतरी वेळ त्या बोटाच्या टोकावर हुळहुळत राहतो - रोमी हातातला हात काढून निघून गेल्यावरही स्वरूपाला त्याचा तो दमट-उबदार स्पर्श तिच्या तळव्यावर जाणवत राहिला. 


आत्मशोधाच्या मार्गावर कोरा कॅनव्हास घेऊन पुढे जाताना या रोमी नावाच्या फुलपाखराचे आणि त्याने आयुष्यात भरलेल्या रंगांचे काय करायचे याचाही विचार स्वरूपाला करावाच लागणार होता!


Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर