माती

 



१)

आज सकाळपासून तिची ही बॅकयार्ड मध्ये जाण्याची तिसरी चक्कर. दोन आठवड्याच्या वर होऊन गेले बिया लावून, अजून काही कोंब फुटेना? पुस्तकात दिल्या प्रमाणे सगळे जसे च्या तसे केले, अगदी स्टेप बाय स्टेप  - तरी असे का? ती हिरमुसली झाली. पाणी कमी दिले गेले;की जरा जास्तच दिले हे मनातल्या मनात आठवत राहिली. काही केल्या तिची बेचैनी कमी होईना.. 

वर्षाच्या सुरुवातीला या घरात मूव्ह होतानाच तिने बॅकयार्ड मध्ये काय काय लावायचे ते ठरवून टाकले होते. नव्या घरी, नव्या जागी स्वतःला रुजवताना, ती हे स्वप्नही रुजवत होती. त्यालाही तिच्या स्वप्नाची पूर्ण जाणीव.. त्यामुळे "तुझी बाग तुला हवी तशी कर" असे तिला सुरुवातीलाच सांगून त्याने हौशीने तिला लागणारी अवजारं, कुंड्या, खतं, रोपं असं सगळं आणून दिलं आणि त्यामुळे तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलं. जुन्या घरात सुद्धा बाल्कनी मध्ये तिने एक कोपरा हिरवाईने सजवला होता. त्या रोपांचं रुजणं, वाढणं तिला एक आत्मिक समाधान द्यायचं - नेहमीच. आपल्याला स्वतःला हे नाही अनुभवता आलं - नाही वाढवता आलं आपलं बीज आपल्या मातीत, आपल्या शरीरात... याचं शल्य अंशतः कमी व्हायचं. अनेक वर्षांपूर्वीचं आत्येसासूचं बोलणं तेंव्हा तिच्या खूप जिव्हारी लागलं होतं - म्हणे बाकी कित्ती गुणी माझी भाचेसून पण तिच्या मातीला कोंबाचं दान नाही.. त्यावेळी तिला वाटलं होतं की जमीन फाटावी आणि सीता जशी गेली तसे आपणही त्या जमिनीत, मातीत लुप्त होऊन जावे...संपून जावे. कित्ती डॉक्टर्स, दवाखाने, औषधोपचार अगदी विश्वास नसताना घरातील मोठ्यांच्या आग्रहाखातर नवस-सायास पण झाले, पण नाही आले यश कशाला. होता करता १०-१२ वर्ष निघून गेली, मग मूल दत्तक घेण्याचा विचारही मागे पडला. २५ एक वर्षं झाली असतील आत्येसासूबाईंच्या त्या घटनेला, पण आजही आठवण झाली की तिचे डोळे नकळत भरून येतात. जखमा कालांताने भरतात ते खरं आहे, पण ती खपली एवढी नाजूक असते की आठवणींच्या छोट्याश्या फुंकरीने गळून पडते आणि जखम भळभळायला लागते. एवढी एक गोष्ट सोडली तर त्या दोघांचे आयुष्य खरंच दृष्ट लागण्यासारखे होते. कुटुंबातील लहान-थोरांचे लाड, काळजी दोघांनी अगदी मनापासून घेतलेली. प्रसन्न घर, हसतमुख चेहरा आणि आपुलकी याच्यावर असलेली सुबत्तेची झालर सगळं काही सामावून घ्यायची. आणि त्यांची परस्परांना असलेली घट्ट साथ उरलेली पोकळीही नष्ट करून टाकायची....  

गॅस वर ठेवलेल्या चहाच्या किटली ची शिट्टी वाजली आणि तिची तंद्री मोडली. लगबगीने घरात येऊन तिने गॅस बंद केला आणि बागकामाचे पुस्तक परत उघडले. शेवटच्या पानावर काही महत्वाच्या नोंदी होत्या त्यात "माती जुनी झाली असेल किंवा मातीचा कस कमी झाला असेल आणि त्यामुळे अपेक्षित परिणाम लावलेल्या रोपांत किंवा बियाणात दिसत नाही, तर अशावेळी टॉप सॉईल - नवी माती वरून घालून बघा. बऱ्याचदा त्याचा उपयोग होतो" असे लिहिलेले होते. हे वाचताच तिच्या मनाला उभारी आली. त्याला फोन करून ऑफिस मधून येताना टॉप सॉईल च्या २ पिशव्या नर्सरी मधून आणायला सांगितल्या. 

त्या नंतर एका आठवड्यातच हिरवे कोंब बाहेर आले आणि तिच्या ओठांवर हसू उमटले. त्या कोंबांकडे डोळे भरून पाहताना तिने हलकेच त्याला विचारले, "आपल्याला का नाही मिळाली रे कुठली टॉपसॉईल?"


२)

आयुष्य गेलं खुल्या आभाळाकडे झेपावण्यात. पंखात वारा भरायचा आणि घ्यायची भरारी. तोच तर धर्म ना आपला? या व्यतिरिक्त दुसरे ध्येय असे काही नव्हतेच. पण आजचा दिवस वेगळा होता. पंखात बळ एकवटून त्याने झोकून दिले स्वतःला आभाळाच्या दिशेने, परंतु काही क्षणातच त्याचे ते उसने अवसान गळून पडले आणि तो हवेला कापत जलद गतीने खाली जमिनीकडे खेचला जाऊ लागला. 

आकाशात मुक्त संचार करताना त्याने कित्ती वेगवेगळे प्रदेश खाली जमिनीवर पहिले होते. प्रसंगी उतरून, झडप घालून त्याच मातीत आपले भक्ष्यही पकडले होते. पण हे सगळे करताना त्या जमिनीशी, मातीशी तो कधीच रेंगाळला नव्हता. काम झाले की परत पंखात वारा भरून झेप आकाशाकडे. 

आज मात्र गरगरत खाली येताना एकाच वेळी त्याला त्याची हतबलता आणि जमिनीबद्दलची अनामिक ओढ या दोन टोकाच्या भावनांची जाणीव झाली. प्रथमच आभाळाशी जन्मापासून असलेले त्याचे नाते मागे पडत होते, तुटत होते आणि त्याचे दुःख होताना मातीची वाटत असलेली नवी ओढ त्याला सुखावत होती. ती दोन्ही हात पसरून त्याला कवेत घेण्यासाठी जणू वाट पाहात उभी होती.. आणि आता तो तिच्यामध्ये सामावून, मिसळून जाण्यास तयार होता. जगताना आभाळाशी ठेवलेली एकनिष्ठता मृत्यूला कवटाळताना मातीला समर्पित करण्यास उत्सुक होता.. 

३)

पायाखाली तिम्बल्या जाणाऱ्या मऊ, मुलायम मातीला ठाऊक नव्हते, की ती आज कुठल्या कुंभाराच्या चाकावर चढणार आहे मडके घडायला किंवा एखाद्या शिल्पकाराच्या साच्यात जाऊन बसणार आहे कुठल्या मूर्तीचे रूप घ्यायला. मडके बनली तर जाईल एखाद्या शेतकऱ्याचा घरात पाणी साठवायला किंवा कोणाच्या घरातील एखादा कोपरा सजवायला. मूर्ती बनली तर एखाद्या देवळात पुजायला किंवा कुठल्या प्रदर्शनात मांडायला... सगळा प्रवास नियतीच्या अधीन!

याआधी बरंका हीच माती होती गावाबाहेरच्या एका शेताच्या बांधावर. बांधावरून शेताची कसली जाणारी जमीन बघत कधी तळमळत म्हणायची - का तिच्या पोटावरून असा नांगर फिरवतात तर कधी उसासत पुटपुटायची - मी इथे बांधावर राहून काय उपयोग? बिनकामी गवताखेरीज काही उगवत नाही इथे. खाली शेतात असते तर मी सुद्धा पिकवले असते वेगवेगळ्या धान्यांचे टप्पोरे दाणे. माझ्या मेलीचे नशीबच खोटे.. 

त्या बांधाच्या पलीकडे शेतकऱ्याचे खोपटे होते. खोपट्याच्या समोर बांध आणि बांधाखाली शेत. अलीकडे हातपाय चालेनासे झाल्याने म्हातारा शेतकरी खोपटा बाहेरच्या अंगणात खाटेवर पडून असे. पडल्या-पडल्या बांधावरच्या मातीकडे बघत आपल्या तरण्या पोरांना सांगत असे - मी मेल्यावर माझी राख त्या बांधावरच्या मातीत मिसळा रे. तिनंच सांभाळलं आहे शेताला आणि आपल्या घरा-दाराला. तिच्याच कुशीत विसावूनच माझ्या आत्म्याला शांती मिळेल...

~प्रीती देशपांडे


Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर