मनोविश्व पाचोळ्याचे

 

झाडाला संवेदना असतात ना? मग तशाच संवेदना पानांना देखील असतील ... मग गळून गेलेल्या पानांना हि असू शकतील....   सहसा आपण पाचोळ्यामधे साचलेल्या पानांच्या बाबतीत तितके संवेदनशील कधीच नसतो .... पण समजा त्यांना देखील स्वतःचे विचारविश्व असेल तर ते कसे असेल?

झाडापासून पहिल्यांदा निखळून हवे मध्ये अलगद तरंगताना येणारा पहिला विचार काय बरे असेल? इतके दिवस असलेले झाडावरचे परावलंबन संपून  झाडावर बसायला येणाऱ्या पक्षांप्रमाणेच जणू आपण उडत आहोत कि काय असे वाटत असणार.... हवेतून जमिनीवर टेकल्यावर मात्र स्वातंत्र्याच्या भ्रमाचा भोपळा फुटत असेल. हवेत उड्डाण घेण्यासाठी आपण किती असमर्थ हे लगेच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे लक्षात आल्यावर नैराश्याची भावना नक्कीच येत असेल. मग मात्र झाडापासून का दुरावलो, झाडाने कसे एका क्षणात परके केले यामागचे क्रौर्य हळू हळू उमगत  असेल.

ज्या झाडाच्या अंगावर आपण पावसात न्हालो, वादळ वाऱ्यांना तोंड देऊन उभे राहिलो, कधी साथ सोडली नाही. त्याच झाडावरती होणार पक्षांचा चिवचिवाट जवळून ऐकला, मोहोर अनुभवला, क्षितिजावर होणारे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे खेळ पाहिले. आपल्या हरित्कणांमुळे झाडाचे पोषण झाले. पण एकदाचे ते हरितकण काहीसे विरळ काय झाले तर लगेच झाडाने आपली साथ सोडावी याचा विषाद कायमचा मनात राजाच्या असेल. अशात देखील आपल्या शिवाय झाडे कसे रूक्ष आणि भेसूर दिसते हे पाहून तू माझी किंमत नाही केली म्हणून असे झाले अशी सूडबुद्धी जागी होत  असताना पुन्हा एकदा मला स्वीकारशील का अशी केविलवाणी अपेक्षा देखील येत असेल

वसंतामध्ये नवी पालवी आल्यावर मात्र आपल्या आशा अपेक्षा किती भाबड्या होत्या हे उमगत असावे. नव्या पानांनी झाड पुन्हा बाहेरून आले तर मात्र आपले परतीचे दरवाजे हे कायमचे बंद झाले असून आता मात्र या सृष्टीतून मोक्ष घेतलेला बरा हा साक्षात्कार घडत असणार. तो पर्यंत कुण्या प्राण्याच्या पायदळी तुडवले जाणे, वाऱ्यामध्ये फरफटत जाणे, पावसाच्या पाण्यात वाहवत जाणे, अळ्यांचे कुरतडणे हे सगळे मुकाट्याने आणि कोणतीही तक्रार करता अनुभवत हळू हळू या मातीशी मिसळून जाणे हा प्रवास ते पान  करत असणार

  माणसांमध्ये देखील स्वतःच्या आधारापासून दुरावलेली मन वृद्धाश्रमात राहत असतात. स्वतःच्या मोक्षाची वाट पाहत. तो मानवी पाचोळा म्हणता येईल

काळाच्या बघत शहरांमध्ये मोडकळीला आलेल्या वास्तू  देखील अशाच. तो शहरीकरणाचा पाचोळा म्हणता येईल

आपल्या मनाच्या अडगळीत विस्मृतीत गेलेल्या आठवणींना आपण स्मृतीचा पाचोळा म्हणू शकू

शेवटी पाचोळ्याचे काय आहे.. तो साफ करावाच लागतो.. कारण एकदा का नवी पालवी फुटली कि तिचा प्रवास सुरु होता पाचोळा बनण्याच्या मार्गावर

Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर