दत्ता


परवा ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये दैववाद विरुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद अशी चर्चा रंगली होती. दोन्हीकडचे लोक आपापले डबे खात तावातावाने आपापले मुद्दे मांडत होते, अनुभव सांगत होते. तेव्हा मला हा किस्सा आठवल्याशिवाय राहिला नाही. आठवला कसला, जे विस्मृतीत जातं ते आठवतं. ही घटना माझ्या जगण्याचाच भाग झाली आहे. तसा माझ्या बुद्धीचा देवावर किंवा 'काहीतरी आपल्याला न दिसणारी मोठी शक्ती असते' वगैरेवर विश्वास नाही. पण माझा तर्क, बुद्धी यांनी जिथे येऊन हात टेकले अशी ही गोष्ट. 

अण्णा भिडे चाळीत पाऊल ठेवल्यापासून अख्ख्या चाळीसाठी जे गप्पांचा विषय झाले होते, ते अगदी आजतागायत. जेवढं  अण्णा स्वतःला चाळकऱ्यांपासून दूर ठेवत, तेवढंच त्यांच्याविषयीचं गूढ वाढत असे. त्यांचं व्यक्तिमत्वच असं गहिरं होतं. शिडशिडीत अंगकाठी, पांढराशुभ्र लेंगा-सदरा, बऱ्याच चंदेरी झालेल्या भरघोस दाढीमिशा, सतत गंभीर चेहरा आणि खोल विहिरीसारखे थांग लागू न देणारे डोळे. 

पाचपोरांच्या खोलीत ते एकटेच भाड्याने रहात. फार कुणाशी बोलत नसत. कधी माझ्या समोर आले की डोळ्यात असे बघत की एकाच वेळी करुण आणि भयानक वाटावं. चाळ म्हणल्यावर लोकांना नाकं खुपसायला आणि कुजबूज करायला काहीही कारण पुरतं. कुणी म्हणे 'खवट आहे म्हातारा'. कुणी म्हणे 'सरळमार्गी आहे बिचारा, आपण बरं, आपलं काम बरं.' ते ज्या परिस्थितीत चाळीत राहायला आले तीही बऱ्याच अंशी कारणीभूत होती या गप्पांना. 

त्यांच्या आधी त्या खोलीत दत्ता ढेरे दोनेक वर्ष राहत होता. तो मूळचा साताऱ्याकडच्या एका खेडेगावातला होता. कुटुंब तिकडेच होतं. हा मुंबईत नोकरीसाठी राहत होता. दत्ता आल्यापासून माझ्या बरोबरीचं कुणीतरी चाळीत असल्यामुळे मी खूष होतो. तो आमच्या घरी येऊन जाऊन असे. त्यामुळे त्यालाही त्याच्या कुटुंबापासून दूर असल्याचं जाणवत नसे. माझं आणि त्याचं ऑफिसही फार दूर नसल्याने आम्ही एकत्रच जा-ये करत असू. दत्ता सरळमार्गी होता. कामात तसा यथा-तथाच होता, पण बेट्याच्या बोटांत जादू होती. अक्षर असं वळणदार की बघत राहावं. दत्ताला चित्र काढताना बघणं म्हणजे सूख. हुबेहूब पोर्ट्रेट काढत असे. त्याचा एक एक स्ट्रोक म्हणजे एक एक तान. 

त्याचे वडील शेती करत. गावी मोठा कुटुंबकबिला होता. २ सख्ख्या बहिणी होत्या. मध्यंतरी त्याचे आई वडील त्याच्याकडे महिनाभर रहायला आले होते. दत्ता तेव्हा फार खूष होता. आईच्या हातचं काही बाही आणून देताना त्याचा चेहरा खुललेला असे. त्याच्या आईचं आणि त्याचं बरंच सूत होतं. दुर्दैवानं आईवडील गावी परतल्यानंतर थोड्याच दिवसात दत्ताची आई गेली. दत्ता तेव्हापासून जरा बदललाच. घुम्या झाला. आपल्या आपल्यातच रहायला लागला. सतत हरवल्यासारखा.

एके दिवशी आईचं ऑइल पोर्ट्रेट करायचं त्याच्या मनानं घेतलं. त्याच्याकडच्या कॅनव्हासवर त्यानं पेन्सिलने कच्चं चित्र काढायला सुरुवात केली. त्याला हवे ते रंग आणि बाकीचं साहित्य आणायला दुकानं बंद व्हायच्या आत त्याला स्टेशनजवळच्या दुकानात जायचं होतं. सोबत येतोस का विचारायला तो संध्याकाळचा घरी आला होता. काहीतरी क्षुल्लक कारणामुळे मला घरी थांबणं भाग होतं. दत्ता एकटाच निघाला आणि चाळीजवळच्या चौकातच रस्ता ओलांडताना त्याचा अपघात झाला. या गोष्टीला आता ५ वर्षं होत आली. तरी 'मी त्याच्यासोबत गेलो असतो तर' या विचाराने मला अजूनही बरेचदा झोप येत नाही. त्या अपघातात दत्ता गेला. 

पाचपोरांच्या त्या खोलीतच दत्ताचे दिवस पार पडले. चाळीतले शेजारी-पाजारी हळहळले आणि चार दिवसांत सगळ्यांचा रहाट पुन्हा सुरु झाला. जणू काही घडलंच नाही. खोली नव्या बिऱ्हाडासाठी सज्ज झाली. पण ती काही भाड्यानं जाईना. चाळीत नाही नाही त्या कंड्या पिकू लागल्या. 'खोली कुणाला लाभत नाही', 'खोलीत दत्ताचं भूत राहतं', 'तिथं राहिलेला माणूस मरतो' एक ना दोन. असलं काहीतरी ऐकून कोण विषाची परीक्षा करणार? खोली तशीच कुलपात राहिली जवळजवळ वर्षभर. 

अशी ती खोली, तिचा इतिहास ऐकूनही अण्णांनी घेतली. उणापुरा एखादा महिना झाला असेल अण्णांना येऊन. एक दिवस खोली सताड उघडी ठेऊन अण्णा निघून गेले. त्यांच्या किडुक मिडूक सामानासकट. कुणालाही काहीही पत्ता लागू न देता. खोलीचं भाडं म्हणे आदल्याच दिवशी पोचतं झालं होतं पाचपोरांकडे. सकाळी सकाळी गलका ऐकून मी बघायला गेलो. खोली रिकामी होती. फक्त चार भिंती. फक्त भिंतीवर दत्ताच्या आईचं सुंदर हुबेहूब ऑइल पोर्ट्रेट होतं. मी जवळून बघितलं तर त्याचे रंगही अजून ओले होते!

छायाचित्र: आदित्य गणपुले 
छायाचित्र संपादन: समृद्धी घैसास 

Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

शिशिर